Article by Dr. Satilal Patil, Author of Dreamers and Doers.
Date: 29 August , 2021

शेतीचा हंगाम सुरु झाला की शेतीरासायनांच्या विषबाधेच्या बातम्या ऐकायला मिळतात. शेतीरासायने वापरतांना काळजी न घेतल्याने हे अपघात घडतात. काहींना गंभीर इजा होते तर काहीजणांना जीवदेखील गमवावा लागतो. शेतीरासायने विषारी असतात हे सगळ्यांना माहित असून देखील या घटना घडतात. एखादा बैल मारका असला, तर आपण त्याच्या जवळ जाणं टाळतो किंवा त्याच्याशी काळजीपूर्वक वागतो. मग फवारा विषारी आहे हे बाटलीवर लिहिलेले असूनसुद्धा इथं ही काळजी का घेत नाही हा यक्षप्रश्न आहे. गावात घरोघरी अन्न साठवायला शेतीरासायनांचे डबे वापरले जातात. एवढंच काय पण सकाळी सकाळी डब्बा टाकायला कीटकनाशकांचेच डब्बे सर्रास वापरतात. भल्या पहाटे, कीटकनाशक, तणनाशक, बुरशीनाशक, टॉनिक यांचे डब्बे हागणदारीमुक्त गावाबाहेर रांगेत बसलेले असतात.

कीटकनाशकांचे द्रावण बनवतांना, फवारतांना आणि फवारणीनंतर आपण या विषाच्या संपर्कात येत असतो. या विषाचे आरोग्यावर अल्पकालीन आणि दीर्घकालीन दुष्परिणाम होतात. त्यामुळे त्यांचा वापर करतांना योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. या रसायनाच्या संपर्कात आल्यावर, ते आपल्या शरीरात नाक, तोंड आणि कातडी या तीन मार्गाने प्रवेश करू शकतात.

शेतीऔषधाचा विषारी वास किंवा वाफ नाकावाटे फुफ्फुसात जाते. त्यामुळे शरीराला ऑक्सिजनची उपलब्धता रोखली जाते. त्यामुळे पेशंट गुदमरतो. प्रसंगी त्याचा जीवही जातो. अश्या वेळेस रोग्याला मोकळ्या हवेत न्यावे, बटणे काढून कपडे ढिले करावे आणि गरज पडल्यास कृत्रिम श्वाच्छोश्वास द्यावा.
तोंडावाटे शेतीरसायन गेल्यावर विष सरळ पोटात असर करते. हे पोटविष जीवघेणं ठरते. म्हणून फवारल्यावर तंबाखू, गुटखा किंवा इतर काहीही खाऊ नये. फवारा तोंडात जाणार नाही याची काळजी घ्यावी.

काही शेतीरासायने त्वचेतुन शोषले जाऊन सरळ रक्तात पोहोचतात. सर्वात जास्त शेतीऔषधाचा संपर्क कातडीशी येतो. त्यामुळे फवारणीपूर्वी त्वचा झाकून ठेवतील अशी अंगभर कपडे घालणे महत्वाचे आहे. शेतात गरम होते, घाम येतो अशी कारणे सांगत, उघड्या अंगाने किंवा नुसत्या बनियांवर फवारू नये. लांब बाह्यांचा शर्ट, लांब पँट, पाण्यात ओले होणार नाहीत असे हातमोजे (चामड्याचे किंवा कापडी नको), लांब रबरी जोडे, डोक्यावर टोपी, गॉगल घालून फवारावे. डोळ्यात कॉन्टॅक्ट लेन्स असेल तर रसायन त्यात अडकून राहत. त्यामुळे योग्य ती काळजी घ्यावी किंवा कॉन्टॅक्ट लेन्स काढून फवारणीला जावे.
१. कीटकनाशक वापरण्याआगोदर घायची काळजी:
– बाटलीवरचं लेबल काळजीपूर्वक वाचा.
– फवारतांना काय काळजी घ्यायची आहे जाणून घ्या.
– या विषावर काय प्रथमोपचार आहे हे समजून घ्या.
– वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे वापरा.
२. द्रावण बनवतांना घ्यायची काळजी:
– फवारतांना धूम्रपान करू नये किंवा काहीही खाऊ नये.
– लेबल वाचून, त्या प्रॉडक्ट ची शिफारस ज्या किडीसाठी आहे त्यासाठीच वापरवे . डोस जास्त किंवा कमी करू नये.
– बाटलीवर कोणत्या रंगाचा त्रिकोण छापला आहे ते पाहावे. शक्यतोवर लाल रंगाचा त्रिकोण असलेले शेतीरासायने फवारणे टाळावे. ते शेतातील मधमाश्यांना संपवू शकतात.
– जेवढं औषध फवारायच आहे तेवढंच द्रावण बनवावं. जास्त बनवून दुसऱ्या दिवशी वापरू नये.
– शेतीऔषधांचं द्रावण मोकळ्या जागेत बनवावे. बंद खोलीत ते करू नये. बरेचसे शेतीरासायने ज्वलनशील असतात. त्यामुळे आग लागू शकते.
– कीटकनाशक मिसळलेल्या जागेत लहान मुले, त्यांची खेळणी आणि पाळीव प्राणी, यांना जाऊ देऊ नये. ती जागा स्वच्छ आणि कोरडी केल्यावरच त्यांना प्रवेश द्यावा.
– औषध बनवतांना किंवा फवारतांना ते कपड्यावर पडले असेल, तर कपडे ताबडतोब बदलावे. शरीराचा तो भाग साबणाने धुवावा.
३. फवारतांना घ्यायची काळजी:
– फवारतांना वाऱ्याची दिशा लक्षात घ्यावी. वाऱ्याच्या विरद्ध दिशेने फवारू नये.
– अति लहान थेंबांचा आकार असला तर हवेने फवारा दुसरीकडेच उडतो. त्यामुळे जास्त बारीक थेंबाचा फवारणीपंप मोकळ्या हवेत फवारतांना टाळावा.
– झाडाच्या जास्तीत जास्त जवळ नोझल नेऊन फवारावे, म्हणजे रसायन वाया जात नाही.
– उन्हात किंवा ३५ डिग्री पेक्षा तापमानात फवारू नये.
– प्रमाणात फवारावे. जास्त फवारून झाडाला अंघोळ घालू नये आणि फक्त तीर्थासारखे कमी शिंपडून काम भागवू नये.
– विहीर, कालवा किंवा नदीजवळ शेतीरासायनांचे द्रावण बनवू नये.
४. फवारल्यानंतर:
– द्रावण बनवायला वापरलेली भांडी, स्प्रे पंप, कपडे, ग्लोज, बूट ई. व्यवस्थित धुवून वाळवावी.
– रिकामे डब्बे, बाटल्या तोडून, यांची काळजीपूर्वक विल्हेवाट लावावी. त्यांना इतर कोणत्याही कामासाठी वापरू नये.
– फवारल्यानंतर पीएचआय म्हणजे काढणीपूर्व काळ तपासावा. त्यानंतरच पिकाची काढणी करावी.
आपल्यावर शेतीरासायनांचा तात्काळ असर झाला नाही तरी भविष्यात त्याचे दुष्परिणाम दिसू शकतात. त्यांच्या संपर्कात जास्त काळ राहिल्याने विष शरीरात साचत जातात. आपले शरीर चाळणीसारखे असते. ते रसायने गोळा करत असते. त्यामुळे कालांतराने शरीरात साठलेले कीटकनाशके भविष्यातील आजारपणाचे कारण ठरू शकतात. या पद्धतीने काळजी घेतल्यास कीड-रोग आणि अपघात यांचे एकत्रित नियंत्रण करता येईल.
………… लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे डायरेक्टर आणी ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.

महत्वाचा संदेश सर
कृषी रसायने ,
वापरण्या अगोदर , द्रावण बिनवितांना ,
फवारणी करतांना , फवारणी नंतर ,
घ्यावयाची काळजी बाबत उत्तम माहिती मिळाली.
Dr. Satish very well written with a very simple language…
Keep it up..
Dr. Jitendra Kulkarni Nashik